'
उदगीर - वृक्षारोपणाच्या माध्यमातून उदगीर विधानसभा क्षेत्रामध्ये हरितक्रांती निर्माण करायची आहे. त्याचा प्रारंभ आपण वृक्षलागवड करून उदयगिरीतून करूयात, असे मत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे होते.
यावेळी पुढे बोलताना ना. बनसोडे म्हणाले, या वर्षभरात आपल्याला 'हरित गाव' संकल्पना राबवायची आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 210 ग्रामपंचायतीमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचा संकल्प केला जातो आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 'पाटोदा' गावाप्रमाणे वृक्षारोपणाच्या बाबतीत आदर्श खेडी निर्माण करायची आहेत. त्याचबरोबर वृक्ष संगोपनासाठी लागणारा खर्च शासनाच्यावतीने नागरिकांना देऊन वृक्षसंवर्धनासाठीचा 'बिहार पॅटर्न' आपण उदगीर विधानसभा क्षेत्रामध्ये राबवणार आहोत, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना नागराळकर म्हणाले, पर्यावरणाच्या बाबतीत देश व महाराष्ट्रासाठी उदगीर विधानसभा क्षेत्र आदर्श व्हावा. प्रत्येकाने आपल्या जीवनात इतरांना सावली देणारे एक तरी झाड लावावे. कुठल्याही रोगानंतर दवाखान्यात व्हेंटिलेटर जे कार्य करते तेच कार्य वृक्ष करतात. त्यामुळे ऑक्सिजन देणारे वृक्ष आहेत, हे लक्षात घेऊन वृक्ष लागवड व संगोपनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी म. ए. सोसायटीचे सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य मलिकार्जुन मानकरी, ॲड. एस .टी. पाटील, ॲड. अजय दंडवते, प्रा. आडेप्पा अंजुरे, जगदीश बागडी, डॉ. रेखा रेड्डी,नाथराव बंडे, बसवराज पाटील मलकापूरकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर ,तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, न. प. मुख्याधिकारी भारत राठोड, विभागीय वनाधिकारी प्रियंका गंगावणे, वनअधिकारी श्री. गायकर, सहयोग बँकेचे चेअरमन रमेशआण्णा अंबरखाने , वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे ,तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रा बी. एन. गायकवाड ,प्रा एस .एस. पाटील यांचा आणि वृक्षारोपण कार्याबद्दल डॉ. प्रकाश येरमे, 'ग्रीन आर्मी'च्या अरुणा भिकाने , 'कारवा फाऊंडेशन'च्या आदिती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगून वृक्षारोपणाची आवश्यकता सांगितली. संस्था सचिव प्रा. मनोहर पटवारी यांनी पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी तर आभार संस्था सदस्य डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा