थोडे गांभिर्याने घ्याल का ? ...... मुख्याधिकारी राठोड यांची उदगीरकराना भावनिक साद *कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उदगीर नगरपालिका स्तरावर सर्वोतोपरी आम्ही जीवाचे रान करून मदत करीत आहोत*. *आम्ही तुमच्या साठी घराबाहेर आहोत,तुम्ही आमच्यासाठी घरातच राहा.* *• रेड झोन मधील भाग दिवसोंदिवस अधिक वाढतोय.* *•लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी आणखी कडक करावी लागणार* **  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नगरपालिकेच्या स्तरावरून लागणारी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे, तरी लोक लाँकडाऊन मोडून घराबाहेर पडत आहेत, खरंच आपण एव्हड्या महत्वाच्या कामासाठी बाहेर आहोत का? आपल्या जिवापेक्षा जास्त असे कोणते महत्त्वाचे काम असेल? काय करतोय आपण आपल्याच कुटुंबातील लोकांचे आयुष्य धोक्यात तर टाकत नाहीत ना , विचार करा.  उदगीर शहरातील  रेड झोनमधील चाचण्या अधिकाधिक वाढवून रुग्णांची संख्या वाढणार नाही, यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे.आपले देवदूत डॉक्टर्स व सर्व वैद्यकीय कर्मचारी जिवपणाला लावून रूग्नांची सेवा करत आहेत.पोलिस व न.पा.कर्मचारी दिवसभर तुम्हाला घरात सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हात अक्षरशः तळत उभे आहेत.आणि तुम्ही या देशाचे जागरूक नागरिक काय करत आहात ?आपण नगरपालिकाने उभारलेल्या ब्यारिकेट्स तोडत आहात ! कसली ही मानसिकता बरे ! पोलिस प्रशासनाला अधिक कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागत आहे, आम्ही वारंवार फवारणी केली,घर धूवून काढावे तसे रेडझोन परिसर आम्ही फवारणी करून धुवून काढला. मास्क, ग्लोज, सँनिटायझर यांचे ही वाटप केले.आपण घराबाहेर पडू नये म्हणून सर्व 'अत्यावश्यक सेवा' ही घरपोच देत आहोत.सफाई, पाणीपुरवठा, अग्निशमन हे सर्व कर्मचारी जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस आपल्या जीव धोक्यात घालून काम करतायत.लक्षात घ्या या सर्व कर्मचाऱ्यांनाही कुटुंब आहे,त्यांच्या वाटेला डोळे लावून बसलेली त्यांचीही जीवाभावाची माणसे आहेत पण हे कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहेत,हे तुम्ही पाहत नाहीत का ? मित्रांनो, या आजारात मृत्यु येणे या पेक्षा भयानक गोष्ट दुसरी नाही, कारण यातील भयंकर मृत्यूचा मी 'साक्षीदार' आहे.आपल्याकडे कोरोनाचा पहिला रूग्न आणि पहिला मृत्यू काही दिवसापूर्वीच झाला.आपल्या भागात 'कोरोना पाँझिटिव्ह रूग्न ' हे सत्यच मन स्वीकारत नव्हते की लागलीच 'मृत्यू ' ही बातमी धडकली.मृत्यू आणि त्यापाठोपाठ अंत्यसंस्काराचा(विधी) प्रश्न समोर उभा राहिला .काय करायचं? ना नातेवाईक, ना कुटुंबातील आप्त ! मुलांना शेवटच्या क्षणी आईचे साधे अंतिम दर्शन सुद्धा करता आले नाही. कोणीही अंत्यविधीसाठी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत मला वरिष्ठांकडून आदेश आले ,'नगरपालिकेच्यावतीने अंत्यविधी करा.' मी स्तब्ध झालो. पहिल्या रूग्नांच्या मृत्यूच्या बातमीने तुम्ही सुन्न होऊन घरात होतात तेव्हा आम्ही ड्युटीवर होतो .कर्मचाऱ्यांना बोललो तर सगळे घाबरलेले होते मग खरी परीक्षा सुरू झाली .बेघरचे खुर्शीदजी व आमचे मित्र साबेरजी यांच्याशी चर्चा केली.धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांना मी ही सोबत येणार ,असे सांगितले मग ते तयार झाले आणि पुढचा थरार सुरू झाला. सर्व धार्मिक व पारंपरिक बाबीचे पालन ही करायचे होते. कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही महत्वाची होती. आम्ही दवाखान्यातुन डेड बॉडी ,नव्हे तर आमचाही अप्रत्यक्ष मृत्यूच आम्ही घेऊन जात असल्याचा आमचा भास, हा प्रवास सुरु झाला. मी आणि माझे चार लोक ,तो एक तास ,यातील प्रत्येक क्षण युगासारखा जात होता.शेवटी सर्व व्यवस्थित पार पडले आणि सुटकेचा निश्वास सोडला आणि जाणिव झाली की असे का घडावे.मृत्यूचे भयान रूप किती जवळून आपण पाहिले. या सगळ्या घडामोडी घरी कळाल्या.मी अंत्यविधी केल्याच्या बातमीने घर हादरून गेले होते. घरी गेलो तर समोर मुलं, पत्नी आणि मी मात्र निःशब्द होतो .त्यांच्या डोळ्यात पाहण्याची हिम्मत नव्हती. डोळ्यासमोरून सगळा प्रसंग जात नव्हता, झोप ही जणू माझ्या जवळ येण्यासाठी घाबरत होती,डोळे आकाशाकडे लावून रात्र कशी गेली कळाले नाही.सूर्याच्या साक्षीने नवा दिवस आणि पुन्हा तीच सकाळची धावपळ सुरू..... मित्रांनो ,हे एव्हढ्या साठी आपल्या सोबत हा अनुभव शेअर केला की परिस्थिती किती भयावह आहे,हे जाणून, आपण घरी राहावे. जिवाचे रान करून आम्ही तुमच्या साठी काम करतोय मग तुम्ही ही आपली जागरूक नागरिकाची जबाबदारी म्हणून घरीच राहा👏🏻 . आणि आपली ,आपल्या कुटुंबाची व समाजाची काळजी घ्या. तसेच उदगीर शहरातील प्रतिष्ठित आणि दानशूर व्यक्तींना मी नम्र व कळकळीचे आवाहन करू इच्छितो की आज अनेक कुटुंबातील लोकांना अन्नधान्याच्या अडचणी आहेत , अनेक लोक उपाशी आहेत.यासाठी नगर परिषदेच्या वतीने अन्नधान्य गोळा करून किट बनवून वाटप करायचे आहे. माझी नम्र विनंती आहे ,कृपया आपण पुढे येऊन खालील क्रमांकावर मदतीसाठी कॉल करावा. निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आपण प्राधान्याने नगरपालिकेच्या यंत्रणेकडे आवश्यक अन्नधान्यसामुग्री साठी व आवश्यक निधीची ही मदत द्यावी. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे .यासाठी सर्व यंत्रणेकडून चोखपणे कार्य होत आहे. तरीही सध्या शहरातील रेडझोनमध्ये अधिक वाढ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याने या विषाणूचा प्रसार वेळीच थांबवा. उदगीरकरांची साथ आणि सहकार्य समाधानकारक व कौतुकास्पद आहे.अन्नधान्य वितरण आदींबाबत शहरात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नगरपालिका सातत्याने करत असलेल्या कामात आपली साथ हवी. कोरोना बाधित परिसर, नगरपालिकेकडून क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरविण्यात येत असलेली सुविधा, संस्थात्मक क्वारंटाईन सुविधा, पाणी पुरवठा, सर्व कामे न.प. चे सर्वच कर्मचारी जीव धोक्यात घालून करत आहेत तसेच मोठ्याप्रमाणात जनजागृतीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे लोक जागृत झालेले आहेत.शहरात आता रेड झोन वगळता केवळ सकाळी 11 नंतर पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी पोलिस विभागासह अग्निशमन जवानांचीही मदत यासाठी घेण्यात येत आहे.  जीवनावश्यक वस्तू घरपोच उपलब्ध करून देत आहोत, आपण घरी रहा, सुरक्षित रहा . भारत राठोड मुख्याधिकारी ,नगर परिषद, उदगीर  


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही