पर्यावरण व विकास याचं साहचर्य असावं - डॉ. अरुणा खामकर

पर्यावरण व विकास याचं साहचर्य असावं - डॉ. अरुणा खामकर


उदगीर,


         मानव आणि पर्यावरण यांचे नाते अतूट स्वरूपाचे असून आज पर्यावरण वाचवणे काळाची गरज आहे. केवळ विकास करून चालणार नाही, तर विकासासोबतच पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन करायला हवे. पर्यावरणाला महत्त्व नाही दिल्यास भविष्यकाळात कोरोना पेक्षाही महाभयंकर विषाणू निर्माण होतील. त्यामुळे पर्यावरण आणि विकास याचं साहचर्य असणे गरजेचे आहे, असे मत मुंबई येथील प्रा.डॉ.अरुणा खामकर यांनी व्यक्त केले.


      श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना : आव्हाणे व संधी या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या समारोप समारंभास प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील कीर्ती महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. अरुणा खामकर या उपस्थित होत्या. पर्यावरण काल, आज आणि उद्या या विषयावर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे हे होते. तर प्राचार्य डॉ. एस.डी लोहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा. अशा विविध कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून बौद्धिक विकास करून घ्यावा, असे आपल्या मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी लोहारे यांनी सांगितले.


         पुढे डॉ.अरुणा खामकर म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच स्थानिक पातळीवर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सगळ्यांनाच प्रयत्न केले पाहिजेत. जगामध्ये अशी अनेक माणसं आहेत ती शिकलेली नाहीत ते कोणत्या कार्यशाळेत सहभागी झाले नाहीत, परंतु पर्यावरणाच्या संदर्भात त्यांनी मौलिक असे कार्य केले आहे. हे सांगत असताना त्यांनी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोहरे व पद्मश्री पायंग जाधव यांनी पर्यावरणाच्या संदर्भात महत्वाची कामे कशी केली याची उदाहरणे दिली. पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अनेक संदर्भ, नकाशे व आकडेवारी देऊन मौलिक असे मार्गदर्शन त्यांनी केले.


    कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी समारोपापूर्वी दोन सत्र झाले चौथ्या सत्रात देगलूर येथील डॉ. श्रीराम बिरादार यांनी कोरोना काळातील शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यावर भाष्य केले. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीचं मनन करावं. सात्त्विक आहाराला महत्त्व द्यावे. तसेच निसर्गाला त्रास न देता आपली दिनचर्या ठेवावी. शरीराची प्रकृती ही तुमच्या मनाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते, असे विचार व्यक्त केले.


          कार्यशाळेच्या पाचव्या सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ.रणजीत धर्मापुरीकर यांनी माहिती तंत्रज्ञान आणि रोजगार या विषयावर विस्ताराने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाशी मैत्री करणे काळाची गरज आहे. कारण याद्वारे आपणास खूप काही शिकता येते. माहिती तंत्रज्ञान चे बदलते स्वरूप कसे आहे, भविष्यकाळात माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व कसे राहणार आहे, डिजिटल क्रांती काय आहे यासंबंधी पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे डॉ. धर्मापुरीकर यांनी विस्ताराने भाष्य केले. ग्रामीण भागात आज इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे चिकित्सकपणे विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.


  अध्यक्षीय समारोपात डॉ.ए.ए.काळगापुरे म्हणाले, आज पर्यावरणाची काळजी आपण घेत नसल्यामुळेच ही वेळ आलेली आहे. कार्यशाळेच्या सत्रांमध्ये निवडले गेलेले सर्व विषय व वक्ते अतिशय चांगल्या प्रकारचे होते. अशा कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची जनजागृती होते. ही कार्यशाळा चांगल्याप्रकारे यशस्वी झाल्याचे सांगितले.


         विद्यार्थ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी झुम व यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यासकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत प्रश्न देखील विचारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा.ए.जे.रंगदळ यांनी केले तर आभार डॉ.म.ई.तंगावार यांनी मानले.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही