... तर लातूरची जनता सत्ताधार्‍यांना माफ करणार नाही माजी पालकमंत्र्यांचा विद्यमान पालकमंत्र्यांना इशारा

... तर लातूरची जनता सत्ताधार्‍यांना माफ करणार नाही


माजी पालकमंत्र्यांचा विद्यमान पालकमंत्र्यांना इशारा


लातूर/प्रतिनिधी ः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर महानगरपालिकेने एसटीपी प्रकल्प उभा राहावा याकरीता विशेष बाब म्हणून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून उपलब्ध होणारे पाणी लातूर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत उभारल्या जाणार्‍या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाला देण्याचा करारही करण्यात आलेला आहे. या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी मनपातील तत्कालीन भाजपा सत्ताधार्‍यांनी निविदा प्रक्रियाही पूर्ण केली होती. मात्र हा प्रकल्प अजूनही सुरू झालेला नसून यामुळे मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पास पाण्यास टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे हजारो लोकांना रोजगार देणारा मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्प लातूर येथून गेला तर लातूरची जनता सत्ताधार्‍यांना माफ करणार नाही, असा इशारा माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांना अप्रत्यक्षरित्या दिला आहे. खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात बैठक पार पडली. यावेळी माजी पालकमंत्री निलंगेकर यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची झाडाझडती घेऊन एसटीपी प्रकल्प उभारला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.


 


लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला वेगाने चालना मिळावी आणि बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर  यांच्या पाठपुराव्यातून लातूर येथे देशातील चौथा रेल्वे बोगी प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. या बोगी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले असून लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. लातूरला जाणवणारी पाणीटंचाई यामुळे या प्रकल्पास पाण्याची कमतरता भासू नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून लातूर महानगरपालिकेला सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या प्रकल्पातून उपलब्ध होणारे पाणी रेल्वे बोगी प्रकल्पाला देण्याचा करारही झालेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पाण्याची कमरता भासणार नाही आणि मनपाच्या आर्थिक उत्पन्नात भरही पडण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या स्वच्छतेतही मोठी भर पडणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जलदगतीने उभारला जावा याकरीता मनपातील तत्कालीन भाजपा सत्ताधार्‍यांनी यासाठी आवश्यक निविदा प्रक्रियाही पूर्ण केली होती. मात्र राज्यासह मनपातही सत्तांतर झाले. या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस सत्तेत असली तरी मनपाच्या वतीने उभारला जाणारा एसटीपी प्रकल्प अजूनही सुरू झालेला नाही. किंबहुना हा प्रकल्प कागदावरच आहे. त्यामुळे मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पास पाण्याची कमतरता भासण्याची भीती व्यक्त होत आहीे. त्याचबरोबर शहराच्या अस्वच्छतेतही भर पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन काल झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मनपाच्या वतीने उभारला जाणारा एसटीपी प्रकल्प अजून का सुरू झाला नाही याबाबत प्रशासनाला विचारणा केली. तसेच राज्य शासनाकडून कोणतीच हालचाल का होत नाही, अशी झाडाझडती घेतली. सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पास पाण्याची कमतरता भासल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्‍नही उपस्थित केला. हा प्रकल्प सुरू न झाल्यास मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्प इतरत्र स्थलांतरीत झाल्यास विद्यमान सत्ताधार्‍यांना लातूरची जनता माफ करणार नाही, असा इशारा माजी पालकमंत्री निलंगेकर यांनी विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांना अप्रत्यक्षरित्या दिला आहे. यामुळे लातूरच्या विकासात खोडा निर्माण होऊन बेरोजगारांचा रोजगारही हिरावला जाणार आहे, विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील बेरोजगार आपल्याला रोजगार प्राप्त व्हावा याकरीता इतर महानगरांमध्ये स्थलांतरीत होत आहेत. मराठवाड्यातील बेरोजगारांना मराठवाड्यातच रोजगार प्राप्त व्हावा याकरीता या प्रकल्पाची उभारणी केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास १५००० बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार असून या प्रकल्पासाठी आवश्यक असणार्‍या पूरकर उद्योगांमधूनही विकासाला चालना मिळणार आहे. तरी याबाबीचा विचार सत्ताधार्‍यांनी करावा, असा इशारा माजी पालकमंत्र्यांनी दिला आहे.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही