केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे
दिशा समितीचे निर्देश*
लातूर :- जिल्ह्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ने सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दिले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार व्हावीत असे निर्देश दिले. तर आजची दिशा समितीची बैठक खासदार सुधाकर शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांना तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नवीन सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण(दिशा) समितीची बैठक खासदार सुधाकर शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार सर्वश्री संभाजी पाटील निलंगेकर, बाबासाहेब पाटील, अभिमन्यू पवार, धिरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, प्रकल्प संचालक संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई व सर्व समिती सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.
खासदार शृंगारे पुढे म्हणाले की जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन जास्तीत जास्त मजूरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व राष्ट्रीय महामार्गाची कामे अधिक गतिमान पद्धतीने करून ती दर्जेदार झाली पाहिजेत यासाठी अधिक लक्ष द्यावे असेही त्यांनी सूचित केले.
कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यात माझे कुटुंबाची जबाबदारी ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली तसेच या मोहिमेविषयी सर्वसामान्य नागरिक का मध्ये प्रबोधन करावे अशी सूचना खासदार शृंगारे यांनी केली तसेच प्रधानमंत्री आवास योजनेची जिल्ह्यात शंभर टक्के कामे पूर्ण झाली पाहिजेत. त्याप्रमाणेच केंद्रीय योजनांचे अंमलबजावणी करताना त्या-त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना त्याची माहिती दिली गेली पाहिजे. राजशिष्टाचार पाळला गेला पाहिजे. तसेच लोकप्रतिनिधी कामा विषयीच्या ज्या काही सूचना असतील त्यास तात्काळ प्रतिसाद दिला गेला पाहिजे असेही त्यांनी सुचित केले.
या वर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षलागवड करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून त्याबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे हाती घ्यावी अशी सुचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. नरेगा अंतर्गत शक्य तेवढी कामे विभागाने प्रस्तावित करावीत व त्या त्या भागातील लोकांना काम उपलब्ध करुन द्यावीत असेही त्यांनी सूचित केले. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे कामे गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे पूर्ण करावीत तसेच बोरगाव ते नांदेड बॉर्डर रस्त्याचे कामाची पाहणी संबंधित अधिकाऱ्याने करण्याची सूचना श्री बनसोडे यांनी केली.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धिरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यु पवार यांनी नरेगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पालकमंत्री पाणंद रस्त्यासाठी नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करणे, महावितरण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित वीज पुरवठा, रोहित्र दुरुस्ती तात्काळ करणे, कृषी सिंचन योजना, सौर ऊर्जा, राष्ट्रीय महामार्गाची कामे, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या विभागांच्या कामाबाबत समस्या मांडून त्यावर संबंधित विभागांनी तात्काळ कारवाई करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे निर्देश बैठकीत दिले.
या बैठकीस ज्या विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. तसेच बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना बाबत अनुपालन अहवाल पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्रकल्प संचालक यांची असून पुढील बैठकीपासून त्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
ऑनलाइन शिक्षण व शाळा कडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क घ्यावे अथवा घेऊ नये याबाबत स्पष्ट सूचना शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेऊन त्याबाबतची माहिती तात्काळ जिल्ह्यातील नागरिकांना द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत जिल्ह्यात तालुकानिहाय कामांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी दिली.
प्रारंभी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान व कोविड आजाराने मृत्यू पावलेल्या सर्वांसाठी दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिशा समितीच्यावतीने कोरोना आजाराच्या काळात आरोग्य विभागाने बजावलेल्या भूमिकेबद्दल कौतुक करण्यात आले. तसेच यावेळी सर्व संबंधित विभाग प्रमुख यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीय योजनांची माहिती दिशा समिती पुढे पावर पॉइंट द्वारे सादर करण्यात आली. या सभेचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा