ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक

ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर

साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक



उदगीर : एप्रिल महिन्यात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उदगीर शहरातून काढण्यात येणारी ग्रंथ दिंडी ही संस्कारमय अशी दिसली पाहिजे, त्यादृष्टीने शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्याना विविध वेशभूषेत या ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी करून घ्यावे असे आवाहन 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांनी केले. 

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालकुमार मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच या संमेलनाच्या निमित्ताने शहरातून भव्य दिव्य अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी बस्वराज पाटील नागराळकर होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रा. आडेप्पा अंजुरे, प्राचार्य आर. आर. तांबोळी, केंद्रप्रमुख बी. टी. धमनसुरे, प्रतिभा मुळे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नागराळकर म्हणाले, साहित्य संमेलन आता अवघ्या काही दिवसांवर आले असून त्यादृष्टीने ग्रंथ दिंडीच्या तयारीला गती देणे आवश्यक आहे. हे संमेलन या भागातील विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी राहणार असून संमेलना होणाऱ्या बालकुमार मेळाव्यातून उदगीर शहरातील अनेक भावी साहित्यिक समाजासमोर येणार आहेत. तेव्हा या सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अधिकाधिक सहभागी करून घेण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी नागराळकर यांनी केले. 

यावेळी बोलताना प्रा. मनोहर पटवारी यांनी बालकुमार मेळाव्यातून वाचन संस्कृती वाढून मोठे साहित्यिक निर्माण व्हावेत हा हेतू समोर ठेवून दोन दिवस बालकुमार मेळावा घेण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी केंद्र प्रमुख धमनसुरे, प्रतिभा मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य आर. आर. तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योतिबा कांदे यांनी केले.